आला दिवस.....गेला दिवस
अस्ताव्यस्त पसरल्या ढगांनी
संथ वाहून नेला दिवस...
दिवस होतो धूळच धूळ
दिवस वा-याच्या अंगातले खूळ
कधी दिवस होतो स्तब्ध पान
रिचवतो थंड शिडकाव्याची तहान
मंद आचेवर शिजवत ठेवल्यासारखा दिवस...
कधी आणतो कुठूनशी एक वावटळ
वावटळ म्हणजे असते वा-याच्या एका खोडीने
एकत्र आलेले धूळीचे चार कण..
या कणांचे कधीच नसते कसलेच काही म्हणणे
हवेबरोबर उंच उंच गोल गोल फिरत राहाणे
आला दिवस....गेला दिवस
दिशाहिन भटकत्या धुळीच्या कणांचा...
कधी दिवस झालाच पाऊस
तर धूळीचे कण होतात चिखल
तेव्हासुद्धा नसते त्यांचे कसलेच काही म्हणणे
पाय, चाक, पाणी...नेतील तिथे जाणे
आला दिवस....गेला दिवस
नेतो वाहून आपल्यासोबत असे असंख्य धूळीचे कण...